भारतीय उपखंड आणि इतिहास

भारतीय उपखंड आणि इतिहास



१.१ इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये 
१.२ भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये 
१.३ भारतीय उपखंड 


१.१ इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये 
 आदिमानवाच्या जीवनमानातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्याच्या परिसरातील बदलांशी कसे जोडलेले होते, हे पाहिले. अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठच्या कृषिप्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला, याचा आपण आढावा घेतला. 
इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. स्थल, काल, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत. या चार घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. यांपैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजे भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. इतिहास व भूगोल यांचे नाते अतूट आहे. भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते. 

उदाहरणार्थ, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते. डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता अगदी थोडी, तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्ये आणि भाज्या कमी प्रमाणावर उपलब्ध असतात, तर तुलनेने मैदानी प्रदेशातील लोकांना या गोष्टी पुरेशा मिळतात. त्याचा परिणाम खाण्यापिण्यावर झालेला दिसतो. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून रहावे लागते. अशाच पद्धतीने डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जीवनपद्धतीतील इतर गोष्टींमध्येही फरक आढळतो. घरांचे प्रकार आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतात.

१.२ भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये 
आपला भारत देश विस्ताराने मोठा आहे. त्याच्या उत्तरेला हिमालय, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताची अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेला प्रदेश भौगोलिकदृष्ट्या सलग आहे. प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो. त्याचाच उल्लेख आपण ‘प्राचीन भारत’ असा करणार आहोत. आजचे पाकिस्तान आणि बांग्लादेश इ.स. १९४७ पूर्वी भारताचा भाग होते. भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता खालील सहा भूप्रदेश महत्त्वाचे ठरतात. 
१. हिमालय 
२. सिंधु-गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश 
३. थरचे वाळवंट 
४. दख्खनचे पठार 
५. समुद्रकिनाऱ्यांचे प्रदेश 
६. समुद्रातील बेटे 

१. हिमालय  हिंदुकुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे. या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे. मात्र हिंदुकुश पर्वतातील खैबर, बोलन या खिंडींमधून जाणारा खुश्कीचा व्यापारी मार्ग आहे. मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडलागेलेलाहोता.चीनपासूननिघूनमध्यआशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग ‘रेशीम मार्ग’ म्हणून ओळखला जातो. कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशांत पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशीम प्रमुख होते. याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतात प्रवेश केला. अनेक परदेशी प्रवासी या मार्गाने भारतात आले. हिमालय पर्वत खैबर खिंड 

२. सिंधू-गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश : सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या तीन मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्यांचा हा प्रदेश आहे. हा प्रदेश पश्चिमेकडे सिंध-पंजाबपासून पूर्वेकडे सध्याच्या

बांग्लादेशपर्यंत पसरलेला आहे. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्ये आणि साम्राज्ये याच प्रदेशात उदयाला आली.

३. थरचे वाळवंट
 थरचे वाळवंट राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशांतील काही भागांमध्ये पसरलेले आहे. त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानातही आहे. उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा, दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटात पोचते. पाकिस्तानमध्ये तिला हाकरा या नावाने ओळखतात. राजस्थान आणि पाकिस्तानमधील तिचे पात्र आता कोरडे पडलेले आहे. त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे विखुरलेली आहेत.

४. दख्खनचे पठार 
 एका बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा यांमध्ये असलेला भारताचाभूप्रदेशदक्षिणेकडेनिमुळताहोतजातो.त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला हा भूभाग समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो. अशा भूप्रदेशाला ‘द्वीपकल्प’ म्हणतात. भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वतांच्या रांगा पसरलेल्या आहेत. त्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. त्याला ‘पश्चिम घाट’ असेही म्हणतात. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश आहे. दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना ‘पूर्व घाट’ असे म्हटले जाते. या पठारावरील जमीन सुपीक असून तिथे हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषिप्रधान संस्कृती नांदत होत्या. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होते आणि दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता. मौर्य साम्राज्यानंतरही इथे अनेक छोटी-मोठी साम्राज्ये होऊन गेली. 
५. समुद्रकिनाऱ्यांचे प्रदेश 
प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत असे. हा व्यापार सागरी मार्गाने केला जाई. त्यामुळे भारतातील समुद्रकिनाऱ्यांवरील बंदरांतून परदेशातील संस्कृतींशी आणि लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाण-घेवाण होत असे. नंतरच्या काळात खुश्कीच्या मार्गानेही म्हणजेच जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण सुरू झाले. तरीही सागरी मार्गाचे महत्त्व कायम राहिले. 

६. समुद्रातील बेटे 
अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत. तसेच लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे. प्राचीन काळच्या समुद्री व्यापारात या बेटांचे स्थान महत्त्वाचे असावे. ‘पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी’ माहीत अाहे का तुम्हांला? आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट हे जगातील सर्वांत मोठे वाळवंट आहे. थरचे वाळवंट  गंगा नदी



भारतीय उपखंड 


हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरे आजच्या पाकिस्तानात आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांग्लादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग ‘दक्षिण आशिया’ या नावाने ओळखला जातो. याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला ‘भारतीय उपखंड’ असेही म्हणतात. हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झालेला होता.चीन आणि म्यानमार हे आपले शेजारी देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत. तरीही प्राचीन भारताशी त्यांचे ऐतिहासिक संबंध आले होते. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे.









Popular posts from this blog

पृथ्वीची आवरणे

महाराष्ट्रातील नद्या

केंद्रीय कार्यकारी मंडळ