मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये

मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये



शुंग घराणे 
इंडो-ग्रीक राजे 
कुशाण राजे 
गुप्त राजघराणे 
वर्धन राजघराणे 
 ईशान्य भारतातील राजसत्ता 

शुंग घराणे 
सम्राट अशोकानंतर मौर्य सत्तेचे सामर्थ्य कमी होत गेले. शेवटच्या मौर्य राजाचे नाव बृहद्रथ असे होते. मौर्यांचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने बंड करून बृहद्रथाची  हत्या केली आणि तो स्वतः राजा झाला. 

इंडो-ग्रीक राजे
या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्ये होती. त्या राजांना ‘इंडो-ग्रीक राजे’ असे म्हटले जाते. प्राचीन भारतीय नाण्यांच्या इतिहासात या राजांची नाणी अत्यंत महत्त्वाची आहेत. एका बाजूवर राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला देवतेचे चित्र अशा पद्धतीची नाणी बनवण्याची त्यांची परंपरा होती. ती पुढे भारतात रुजली. इंडो-ग्रीक राजांमध्ये मिनँडर हा राजा प्रसिद्ध असून त्याने नागसेन या बौद्ध भिक्खूबरोबर बौद्ध तत्त्वज्ञानाची चर्चा केली होती. मिनँडर म्हणजेच मिलिंद. त्याने भिक्खू नागसेन यांना विचारलेल्या प्रश्नांतून ‘मिलिंदपञ्ह’ या ग्रंथाची निर्मिती झाली. ‘पञ्ह’ या पाली भाषेतील शब्दाचा अर्थ ‘प्रश्न’ असा होतो.

कुशाण राजे
 भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सतत येत राहिल्या. त्यांमध्ये मध्य आशियातून आलेल्या ‘कुशाण’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या. इसवी सनाच्या पहिल्या शतकात वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमध्ये त्यांनी राज्य स्थापन केले. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशाण राजांनी केली. नाण्यांवर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशाण राजांनी सुरू केली. कुशाण राजा कनिष्क याने साम्राज्याचा विस्तार केला. 

सम्राट कनिष्क 
 कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसीपर्यंत पसरले होते. कनिष्काची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत. कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती. कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले होते. श्रीनगरजवळ असलेले काम्पूर नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे. कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. त्याने ‘बुद्धचरित’ आणि ‘वज्रसूचि’ हे ग्रंथ लिहिले. कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता. 

गुप्त राजघराणे 
इसवी सनाच्या तिसऱ्या शतकाच्या शेवटी उत्तर भारतात गुप्त राजघराण्याच्या सत्तेचा उदय झाला. साधारणपणे तीन शतके गुप्त घराणे सत्तेवर होते. गुप्त राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव ‘श्रीगुप्त’ असे होते. समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे गुप्त घराण्यातील विशेष उल्लेखनीय राजे होते. समुद्रगुप्त ः पहिला चंद्रगुप्त या गुप्त राजाच्या कारकिर्दीत गुप्तांच्या राज्यविस्ताराची सुरुवात झाली. 

त्याचा मुलगा समुद्रगुप्त याने आसपासच्या राजांचा पराभव करून हा विस्तार आणखी वाढवला. त्याच्या कारकिर्दीत गुप्त सत्ता आसामपासून पंजाबपर्यंत पसरली होती. तमिळनाडूमधील कांचीपर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेशही त्याने जिंकला होता. समुद्रगुप्ताने मिळवलेल्या विजयांमुळे त्याच्या सत्तेचा दबदबा सर्वत्र वाढला होता. त्यामुळे वायव्येकडील राजे, तसेच श्रीलंकेतील राजा यांनीही त्याच्याशी मैत्रीचे करार केले. 

समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्याने मिळवलेले विजय यांचे वर्णन प्रयागच्या स्तंभलेखात सविस्तर दिलेले आहे. हा लेख ‘प्रयागप्रशस्ति’ म्हणून ओळखला जातो. त्याला ‘अलाहाबाद प्रशस्ती’ असेही म्हणतात. समुद्रगुप्त वीणावादनात प्रवीण होता. समुद्रगुप्ताने विविध प्रकारच्या प्रतिमा असलेली नाणी काढली होती. त्यांतील एका प्रकारात तो स्वतः वीणा वाजवताना  दिसतो. 

त्यावर ‘समुद्रगुप्त’ असे नाव लिहिलेले आहे. दुसरा चंद्रगुप्त ः दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता. गुप्तांचे साम्राज्य त्याने वायव्येकडे वाढवले. त्याने माळवा, गुजरात आणि सौराष्ट्र जिंकून घेतले होते. दुसऱ्या चंद्रगुप्ताने त्याची मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी करून दिला. अशा रीतीने दक्षिणेकडच्या बलशाली वाकाटक सत्तेशी नातेसंबंध जोडले. दिल्लीजवळील मेहरौली येथे एक लोहस्तंभ उभा आहे. तो सुमारे दीड हजार वर्षांहूनही अधिक जुना आहे. तरी तो गंजलेला नाही. प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचे ते एक प्रतीक आहे. या लोहस्तंभावरील लेखात ‘चंद्र’ नावाच्या राजाचा उल्लेख आहे. त्या उल्लेखाच्या आधारे हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे, असे मानले जाते.

दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात ‘फाहियान’ हा बौद्ध भिक्खू चीनमधून भारतात आला होता. त्याने त्याच्या भारतातील प्रवासाचे वर्णन लिहून ठेवले आहे. त्यामध्ये गुप्त साम्राज्यातील उत्कृष्ट राज्यव्यवस्थेची माहिती मिळते.

वर्धन राजघराणे 
गुप्त साम्राज्याचे सामर्थ्य कमी होऊ लागल्यानंतर उत्तर भारतात अनेक राज्ये उदयाला आली. वर्धन राजघराण्याचे राज्य त्यांपैकी एक होते. दिल्लीजवळ असणाऱ्या थानेसर या ठिकाणी प्रभाकरवर्धन नावाचा राजा राज्य करत होता. त्याने वर्धन घराण्याची स्थापना केली. 

हर्षवर्धन हा त्याचा मुलगा होय. हर्षवर्धनाने वर्धन साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्या कारकिर्दीत वर्धन साम्राज्याचा विस्तार उत्तरेला नेपाळ, दक्षिणेला नर्मदा नदी, पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरातपर्यंत झाला होता. कामरूप म्हणजे प्राचीन आसाम. तेथील राजा भास्करवर्मन याच्याशी त्याचे मैत्रीचे संबंध होते. हर्षवर्धनाने आपला राजदूत चिनी दरबारात पाठवला होता. 

हर्षवर्धनाने चीनच्या सम्राटाबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते. त्याने त्याची राजधानी कनौज येथे प्रस्थापित केली. त्याच्या कारकिर्दीत व्यापाराची भरभराट झाली. राज्याच्या उत्पन्नाचा खूप मोठा हिस्सा तो प्रजेच्या हितासाठी वापरत असे. दर पाच वर्षांनी तो स्वतःची सर्व संपत्ती प्रजेला दान करत असे. हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट याने ‘हर्षचरित’ हा हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ लिहिला. 

Nalanda Vidyapeeth Oldest

त्याच्या आधारे हर्षवर्धनाच्या कारकिर्दीची माहिती मिळते. हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने इतर धर्मांनाही उदार आश्रय दिला. हर्षवर्धनाने ‘रत्नावली’, ‘नागानंद’ आणि ‘प्रियदर्शिका’ अशी तीन संस्कृत नाटके लिहिली. त्याच्या काळात युआन श्वांग हा बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आला होता. तो भारतभर फिरला. नालंदा विद्यापीठात तो दोन वर्षे राहिला होता. त्याने चीनमध्ये गेल्यावर बौद्ध ग्रंथांचे चिनी भाषेत भाषांतर केले.

ईशान्य भारतातील राजसत्ता 
ईशान्य भारतातील मणिपूर प्रदेशातील उलूपी या राजकन्येचा अर्जुनाबरोबर विवाह झाल्याची कथा महाभारतात आली आहे. ‘कामरूप’ हे राज्य इसवी सनाच्या चौथ्या शतकात उदयाला आले. पुष्यवर्मन हा कामरूप राज्याचा संस्थापक होता. समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद येथील स्तंभलेखात त्याचा उल्लेख केलेला आहे. कामरूपच्या राजांचे अनेक कोरीव लेख उपलब्ध आहेत. महाभारत आणि रामायण या महाकाव्यांमध्ये कामरूपचा उल्लेख ‘प्राग्ज्योतिष’ या नावाने केलेला आहे. प्राग्ज्योतिषपूर ही त्या राज्याची राजधानी होती. प्राग्ज्योतिषपूर म्हणजे आजचे आसाम राज्यातील गुवाहाटी शहर. ‘पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी’ या
पुस्तकात त्याचा उल्लेख ‘किऱ्हादिया’ म्हणजे ‘किरात लोकांचा प्रदेश’ असा केला आहे. कामरूप राज्याचा विस्तार ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे, भूटान, बंगालचा काही भाग आणि बिहारचा काही भाग या प्रदेशांमध्ये झालेला होता. ईशान्य भारतातील ‘कामरूप’ राज्यात युआन श्वांग गेला होता. त्या वेळी भास्करवर्मन हा तेथील राजा होता. 

Popular posts from this blog

पृथ्वीची आवरणे

महाराष्ट्रातील नद्या

केंद्रीय कार्यकारी मंडळ