सशस्त्र क्रांतिकारी चळवळ

सशस्त्र क्रांतिकारी चळवळ


सन १८५७ पूर्वी इंग्रजी सत्तेविरुद्ध झालेले उठाव आणि १८५७ चा स्वातंत्र्यलढा यांचा अभ्यास आपण केला आहे. त्यानंतरच्या काळात रामसिंह कुका यांनी पंजाबमध्ये सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले होते. 

वासुदेव बळवंत फडके :
 महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा वासुदेव बळवंत फडके यांनी दिला. ब्रिटिश साम्राज्याशी शस्त्राने लढले पाहिजे अशी त्यांची धारणा झाली. त्यांनी वस्ताद लहूजी साळवे यांच्याकडे शस्त्रविद्येचे शिक्षण घेतले. ब्रिटिश सत्तेविरुद्‍ध सशस्त्र उठाव करण्यासाठी त्यांनी रामोशी बांधवांना संघटित करून बंड पुकारले. हे बंड अयशस्वी झाले. ब्रिटिश सरकारने त्यांची रवानगी एडनच्या कारागृहात केली. तेथेच त्यांचा १८८३ मध्ये मृत्यू झाला. स्वातंत्र्यासाठी त्यांनी सशस्त्र लढा उभारला.

चाफेकर बंधू : 
सन १८९७ साली पुण्यात प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रँड याने जुलूम-जबरदस्ती केली. त्याचा बदला म्हणून दामोदर व बाळकृष्ण या चाफेकर बंधंूनी २२ जून १८९७ रोजी रँडचा वध केला. दामोदर, बाळकृष्ण व वासुदेव हे तीन बंधू व त्यांचे सहकारी महादेव रानडे यांना फाशी झाली. एकाच घरातील तीन भावांनी देशसेवेसाठी हौतात्म्य पत्करले. याच सुमारास बिहारमधील मुंडा आदिवासींनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरुद्ध फार मोठा उठाव केला. 

अभिनव भारत : 
सन १९०० मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक यथे  ‘मित्रमेळा’ ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली. १९०४ साली याच संघटनेला ‘अभिनव भारत’ असे नाव देण्यात आले. उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने सावरकर इंग्लंडला गेले. तेथून त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या भारतातील सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मय, पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केली. त्यांनी जोसेफ मॅझिनी या प्रसिद्‍ध इटालियन क्रांतिकारकाचे स्फूर्तिदायी चरित्र लिहिले. १८५७ चा उठाव हे पहिले भारतीय स्वातंत्रयुद्‍ध होते. असे प्रतिपादन करणारा ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला.

सरकारला अभिनव भारत संघटनेच्या कार्याचा सुगावा लागला. त्यामुळे सरकारने बाबाराव सावरकर यांना अटक केली. त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. या शिक्षेचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध केला. सरकारने अभिनव भारत संघटनेशी संबंधित असलेल्या लोकांना अटक करण्यास सुरुवात केली. जॅक्सनच्या वधाचा संबंध सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांशी जोडला आणि त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला भरला. न्यायालयाने त्यांना पन्नास वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा फर्मावली.

बंगालमधील क्रांतिकारी चळवळ :
 बंगालच्या फाळणीनंतर ब्रिटिशविरोधी प्रक्षोभ अधिकच तीव्र झाला. स्थानिक उठावांच्या जागी व्यापक अशा क्रांतिकारी चळवळीचा राष्ट्रीय पातळीवर उदय होऊ लागला. देशातील विविध भागांत क्रांतिकारी विचारांनी भारावलेले तरुण आपल्या गुप्त संघटना स्थापन करू लागले. ब्रिटिश अधिकाऱ्यांना जरब बसवणे, ब्रिटिश शासनयंत्रणा खिळखिळी करणे, ब्रिटिश सरकारचा लोकांना वाटणारा दरारा नाहीसा करणे, ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकणे ही त्यांची प्रमुख उद्‌दिष्टे होती. बंगालमध्ये ‘अनुशीलन समिती’ ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती. अनुशीलन समितीच्या पाचशेच्या वर शाखा होत्या. 

अरविंद घोष यांचे बंधू बारींद्रकुमार घोष हे या संघटनेचे प्रमुख होते. अरविंद घोष यांचा सल्ला व मार्गदर्शन या संघटनेला लाभत असे. कोलकत्याजवळील माणिकताळा येथे या समितीचे बाँब तयार करण्याचे केंद्र होते. १९०८ साली खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्जफोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली; परंतु ज्या गाडीवर त्यांनी बाँब टाकला ती गाडी किंग्जफोर्डची नव्हती. या हल्ल्यात गाडीतील दोन इंग्लिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या. इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. खुदीराम बोस पोलिसांच्या हाती लागले. त्यांना फाशी देण्यात आले. या प्रकरणाचा तपास करत असताना अनुशीलन समितीच्या कार्याची माहिती पोलिसांना झाली. 

त्यांनी या संघटनेच्या सदस्यांची धरपकड सुरू केली. अरविंद घोष यांनाही अटक करण्यात आली. अरविंदबाबूंचा संबंध बाँब तयार करण्याशी जोडण्यात सरकारला अपयश आल्याने त्यांना न्यायालयाने निर्दोष सोडले. अन्य सदस्यांना दीर्घ मुदतीच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. रासबिहारी बोस व सचिंद्रनाथ संन्याल यांनी क्रांतिकारी संघटनांचे जाळे बंगालबाहेर विस्तारले. पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश येथे क्रांतिकार्याची केंद्रे उभारली. व्हाइसरॉय लॉर्ड हार्डिंग्जवर बाँब फेकण्याचे धाडसी कृत्य रासबिहारी बाेस व त्यांच्या सहकाऱ्याने केले. पण हल्ल्यातून लॉर्ड हार्डिंग्ज बचावला. मद्रास प्रांतातही क्रांतिकार्य चालू होते. वांची अय्यर या क्रांतिकारकाने ॲश या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केले. त्यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्माहुती दिली.

इंडिया हाउस : 
भारतातील क्रांतिकार्याला परदेशातील भारतीय क्रांतिकारकांकडून साहाय्य मिळत असे. लंडन येथील इंडिया हाउस हे अशा साहाय्याचे महत्त्वाचे केंद्र होते. पं.श्यामजी कृष्ण वर्मा या भारतीय देशभक्ताने इंडिया हाउसची स्थापना केली होती. या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिल्या जात असत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना अशी शिष्यवृत्ती मिळाली होती. मादाम कामा यांनी जर्मनीत स्टुटगार्ड 
यथे  भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला. याच परिषदेत त्यांनी भारताचा ध्वज फडकावला होता. इंडिया हाउसशी निगडित असलेला दुसरा क्रांतिकारी म्हणजे मदनलाल धिंग्रा हा तरुण होय. त्यांनी कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केले. त्याबद्‍दल धिंग्रा यांना फाशी देण्यात आले.

गदर चळवळ : 
पहिल्या महायुद्‍धाच्या काळात ब्रिटिशविरोधी क्रांतिकारी कार्याला गती मिळाली. ब्रिटिशांच्या शत्रूंची मदत घेऊन भारतामध्ये सत्तांतर घडवून आणता येईल, भारतीय सैनिकांची या प्रयत्नात साथ घेता येईल, असे क्रांतिकारकांना वाटत होते. या संधीचा लाभ घेण्यासाठी क्रांतिकारक संघटना स्थापना झाल्या. ‘गदर’ ही त्यांतील एक प्रमुख संघटना होती. अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी ‘गदर’ या संघटनेची स्थापना केली 
होती. 
लाला हरदयाळ, भाई परमानंद, डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे इत्यादी क्रांतिकारक या संघटनेचे प्रमुख नेते होते. ‘गदर’ म्हणजे विद्रोह. ‘गदर’ हे या संघटनेच्या मुखपत्राचे नाव होेते. या मुखपत्रातून ब्रिटिश राजवटीचे भारतावरील दुष्परिणाम विशद करण्यात येत. भारतीय क्रांतिकारकांच्या साहसी कृत्यांची माहिती सांगितली जाई. अशा प्रकारे राष्ट्रप्रेम व सशस्त्र क्रांती यांचा संदेश ‘गदर’ या मुखपत्राने भारतीयांना दिला. ब्रिटिशविरोधी उठाव करण्यासाठी ‘गदर’ संघटनेच्या नेत्यांनी युद्‍धजन्य परिस्थितीचा फायदा घेण्याचे ठरवले. त्यांनी पंजाबमध्ये ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्यासाठी योजना आखली. 

लष्करामधील भारतीय सैनिकांना उठावात सामील होण्यासाठी उद्युक्त केले. रासबिहारी बोस आणि विष्णु गणेश पिंगळे यांनी उठावाचे नेतृत्व करावे असे ठरले. पण फितुरीमुळे ब्रिटिशांना या योजनेचा सुगावा लागला. पिंगळे पोलिसांच्या हाती सापडले. त्यांना फाशी देण्यात आली. रासबिहारी बोस मात्र निसटून जाण्यात यशस्वी झाले. जपानमध्ये जाऊन त्यांनी आपले क्रांतिकार्य सुरू ठेवले. युद्‍धकाळात परदेशात अन्यत्रही क्रांतिकारी चळवळ कार्यरत होती. बर्लिनमध्ये वीरेंद्रनाथ चट्‍टोपाध्याय, भूपेन दत्त आणि हरदयाळ यांनी जर्मन परराष्ट्र खात्याच्या सहकार्याने ब्रिटिशविरोधी योजना आखल्या. सन १९१५ मध्ये महेंद्रप्रताप, बरकतुल्ला व ओबीदुल्ला सिंधी यांनी काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली होती.

 काकोरी कट :
सरकारच्या दडपशाहीने  सरकारच्या दडपशाहीने क्रांतिकारी चळवळ संपुष्टात आली नाही. गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केल्यावर अनेक तरुण क्रांतिमार्गाकडे वळले. चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेश चटर्जी, सचिंद्रनाथ संन्याल इत्यादी क्रांतिकारक एकत्र आले. क्रांतिकार्याला लागणारा पैसा जमवण्यासाठी त्यांनी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना ९ ऑगस्ट १९२५ रोजी काकोरी या उत्तर प्रदेशातील रेल्वे स्टेशनजवळ लुटला. यालाच ‘काकोरी कट’ म्हटले जाते. सरकारने तत्काळ कारवाई करून क्रांतिकारकांना अटकेत टाकले. त्यांच्यावर खटले चालवण्यात आले. अशफाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी यांना फाशी देण्यात आले. चंद्रशेखर आझाद मात्र पोलिसांच्या हाती सापडले नाहीत. 

हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन  : 
समाजवादी विचारांनी प्रभावित झालेल्या तरुणांनी देशव्यापी क्रांतिकारी संघटना उभी करण्याचे ठरवले. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव इत्यादी तरुण यांमध्ये प्रमुख होते. हे सर्व क्रांतिकारक धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे होते. १९२८ साली दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या बैठकीमध्येया तरुणांनी ‘हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ या संघटनेची स्थापना केली. भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे, हे या संघटनेचे उद्‌दिष्ट होते. 



त्याचबरोबर तिला शेतकरी-कामगारांचे शोषण करणारी अन्यायी सामाजिक-आर्थिक व्यवस्थाही उलथून टाकायची होती. सामाजिक न्यायावर व समतेवर आधारित समाज निर्माण करण्याला भगतसिंग यांनी महत्त्व दिले. शस्त्रे गोळा करणे आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे, ही कामे या संघटनेच्या स्वतंत्र विभागाकडे सोपवली होती. या विभागाचे नाव होते. ‘हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी’ आणि तिचे प्रमुख होते 


चंद्रशेखर आझाद. या संघटनेच्या सदस्यांनी अनेक क्रांतिकारक कृत्ये केली. भगतसिंग व राजगुरू यांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी साँडर्स या अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले. नागरी हक्कांची पायमल्ली करणारी दोन विधेयके या वेळी सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दाखल केली होती. त्यांचा निषेध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बाँब फेकले. सरकारने तत्काळ हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मीच्या केद्रांवर धाडी घातल्या. त्यातून साँडर्सच्या हत्येचे धागेदोरे ही पोलिसांच्या हाती लागले. 

Chandrasekhar azad

सरकारने क्रांतिकारकांची धरपकड सुरू   केली. त्यांच्यावर राजद्रोहाच्या आरोपाखाली खटले भरले. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आले. चंद्रशेखर आझाद मात्र शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती सापडले नाहीत. पुढे अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत ते ठार झाले.


चितगाव शस्त्रागारावरील हल्ला :
 सूर्य सेन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते. त्यांनी आपल्याभोवती अनंत सिंग, गणेश घोष, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्‍डेदार अशांसारख्या निष्ठावान क्रांतिकारकांची फौज गोळा केली. त्यंाच्या साहाय्याने चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना सूर्य सेन यांनी आखली. योजनेप्रमाणे १८ एप्रिल १९३० रोजी क्रांतिकारकांनी चितगावमधील दोन शस्त्रागारांतील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली. टेलिफोन व टेलिग्राफ यंत्रणा त्यांनी तोडून टाकली आणि संदेशवहन यंत्रणा ठप्प करण्यात यश मिळवले. त्यानंतर त्यांनी ब्रिटिश फौजांशी रोमहर्षक लढत दिली.

१६ फेब्रुवारी १९३३ रोजी सूर्य सेन व त्यांचे काही सहकारी पोलिसांच्या हाती सापडले. सूर्य सेन व त्यांच्या बारा सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. कल्पना दत्त यांना जन्मठेप झाली. प्रीतिलता  वड्‍डेदारने पोलिसांच्या हाती न लागता आत्माहुती दिली. चितगाव उठावामुळे क्रांतिकारी चळवळीला गती मिळाली. 

शांती घोष व सुनीती चौधरी या दोन शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीशाला ठार केले, तर बीना दास या युवतीने कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या. अशा अनेक क्रांतिकारी घटना या काळात घडल्या. जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या ओडवायर याचा वध सरदार उधमसिंग यांनी इंग्लंडमध्ये १९४० साली केला

Popular posts from this blog

पृथ्वीची आवरणे

महाराष्ट्रातील नद्या

केंद्रीय कार्यकारी मंडळ